Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावर नेहमी भाजपसाठी काम केल्याचा आरोप केला जातो.
Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नेहमी काँग्रेस नेते राहुल गांधींकडून भाजपसाठी काम केल्याचा आणि भाजपला निवडणुकीत पैसा पुरवल्याचा आरोप केला जातो. पण, आता या आरोपांवर स्वतः गौतम अदानी यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी(दि.26) एएनआयशी बोलताना अदानी यांनी व्यवसायातील मक्तेदारीपासून ते भाजपशासित राज्यांमध्ये काम करण्यापर्यंतच्या विरोधकांच्या आरोपांवर खुलेपणाने आपले मत मांडले.
एएनआय या वृत्तसंस्थेने गौतम अदानी यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही भाग शेअर केला आहे. गौतम अदानी म्हणाले की, आम्ही देशातील 25 राज्यांमध्ये काम करत आहोत. आम्ही काँग्रेस किंवा भाजपचा विचार करत नाही. प्रत्येक सरकारसोबत आम्ही काम करत आहोत. जोपर्यंत राजकारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणत्याही सरकारसोबत काम करण्यास हरकत नाही. (Gautam Adani)
आमचा समूह पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्या आहेत, पण त्या 25 टक्केही काम करत नाहीत. त्या कंपन्या उद्योगाच्या आधारावर मोठ्या आहेत, पण पायाभूत सुविधांच्या आधारावर नाही. हे क्षेत्र काम करण्यासाठी सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक आहे. 5 ते 6 वर्षे या व्यवसायात स्वत:ला वाहून घेतल्याशिवाय हा व्यवसाय करता येत नाही. तुम्हाला 10 वर्षांनंतरच परतावा मिळतो, त्यामुळे इतका धीर कोणाकडे नाही.

आज आम्ही 25 राज्यांमध्ये काम करत आहोत. लोक अनेकदा म्हणतात की, अदानी ग्रुप भाजपच्या राज्यात काम करतो, पण आम्ही केरळमध्येही काम करतो. विंझीगम बंदर हा 20,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तो प्रकल्प काँग्रेस सरकारने दिला. त्यामुळे आम्ही फक्त भाजपसोबत काम करतो असे नाही. आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत. पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प सरकारच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असेही अदानी यावेळी म्हणाले.
धक्कादायक! मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध; मोहिनी वाघने दिली पतीच्या हत्येची सुपारी…
(Gautam Adani)
CR-ANI
